पंधरा कोटीच्या खंडणीप्रकरणी परमवीर सिंह यांच्यासह शिवसेना आमदार गिता जैन यांच्या भावावर गुन्हा दाखल
मीरारोड - मिरा-भाईंदरमधील विकासक शामसुंदर अग्रवाल यांच्या एका जमिन वादाच्या प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी 15 कोटीच्या खंडणीची मागणी करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह शिवसेना सहयोगी आमदार गिता जैन यांचा भाऊ संजय पुनामिया यांच्यासोबत आठ जणांविरूद्ध नरीमन पाँईंट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात संजय पुनामिया यांच्यासह अन्य विकासक सुनिल जैन यांना अटक झाली आहे. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचा घाणाघाती आरोप करणारे परमवीर सिंह हेच आता पोलीसांच्या जाळ्यात अडकण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
मिरा-भाईंदर शहरातील नामांकीत विकासक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या येथील एका जमिन खरेदी विक्री व्यवहारात मोठा वाद निर्माण झाला होता. या वादात अग्रवाल यांना गोवण्याचा प्रयत्न माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी चालविला होता. या प्रकरणातून सहीसलामत सुटका करवून घेण्यासाठी परमवीर सिंह यांनी उपायुक्त अकबर पठाण यांच्या माध्यमातून फिल्डींग लावली होती. पठाण यांचे शिवसेना सहयोगी आमदार गिता जैन यांचे बंधु संजय पुनामिया यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. पठाण यांनी या कामी पुनामिया यांना अग्रवाल यांच्याकडे पाठपुरावा करण्यास सांगितले होते. तर पुनामिया यांनी भाईंदर पश्चिम येथील विकासक सुनिल जैन यांच्यावर ही जबाबदारी सोपविली होती. तसेच पोलीस दलातील श्रीकांत शिंदे, आशा कोरके, नंदकुमार गोपाळे आणि संजय पाटील हे पुनामिया यांच्याकडे पाठपुरावा करीत होते.
या सर्व पोलीस अधिकारी तथा संजय पुनामिया आणि सुनिल जैन यांचे फोन श्याम अग्रवाल यांनी टॅप केले होते. त्यानंतर काल बुधवारी अग्रवाल यांनी या सर्वांवर नरीमन पाँईट पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम 387, 388, 389, 403, 409, 420, 423, 464, 465, 467, 468, 471, 120 (ब), 166, 167, 177, 181, 182, 193, 195, 203, 211, 209, 210, 347, 109, 110, 111 आणि 113 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी आज संजय पुनामिया आणि सुनिल जैन यांना अटक केली आहे. या फिर्यादीचा सविस्तर तपशील देण्यास मात्र पोलीसांनी नकार दिला आहे.
दरम्यान, ईडी प्रकरणाचा ससेमिरा पाठीशी लागल्यानंतर ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप सरनाईक गेल्या काही महिन्यांपासून भूमिगत होते. या काळात शिवसेना सहयोगी आमदार गिता जैन यांनी शिवसेनेवर आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा चांगलाच सपाटा लावला होता. मात्र सरनाईक यांनी अचानकपणे सक्रिय राजकारणात एन्ट्री घेत, राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रु अथवा मित्र नसतो. असे सांगत आमदार गिता जैन यांना सुचक इशारादेखील दिला होता.
आता गिता जैन यांचाच भाऊ एका 15 कोटीच्या खंडणी प्रकरणात अडकल्याने जैन समर्थकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. दुसरीकडे परमवीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने राज्य सरकारने या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे परमवीस सिंह यांच्यासह अन्य पोलीसांनादेखील जेलची हवा खावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.