औरंगाबाद येथील रेल्वे दुर्घटनेत १६ कामगारांचा मृत्यू
रुळावर झोपलेले पाहून मालगाडी थांबवण्याचा केला होता प्रयत्न, रेल्वेची माहीती
औरंगाबाद - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. या लॉक डाऊन मुळे पूर्ण उद्योग धंदे , कंपन्या बंद असल्यामुळे कामगार , मजूर अडकलेले प्रवाशी यांचे अतोनात हाल होत आहेत. गावी जाण्यासाठी रेल्वे, बस सर्व बंद आहे त्यामुळे मजूर , कामगार हे रस्त्याने पायी चालत जात आहेत. असेच मध्यप्रदेश येथील कामगार हे जालण्यावरून पायी चालत गावी जात होते. पायी चालत जात असताना चालून चालून थकल्यामुळे औरंगाबाद येथे रेल्वे रुळावर विसाव्यासाठी थांबले असताना त्यांना झोप लागली. रेल्वे रुळावर झोपलेल्या १६ कामगारांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद रेल्वे दुर्घटने प्रकरणी रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहेत. जालना येथे काम करणारे मजूर भुसावळकडे चालत प्रवास करत असताना थकून रुळावर झोपल्याने त्यांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने १६ कामगारांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादजवळील करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घडला. दरम्यान लोको पायलटने ट्रॅकवर कामगारांना पाहिल्यानंतर मालगाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने दुर्घटना घडली अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
रेल्वेने ट्विट करत माहिती दिली आहे की, “कामगारांना ट्रॅकवर पाहिल्यानंतर लोको पायलटने मालगाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने बदनापूर आणि करमाड स्थानकांदरम्यान दुर्घटना घडली. जखमींना औरंगाबाद सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत”.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशात जाण्यासाठी जालन्यातील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांनी पायी चालत जाण्याचा निर्णय रात्री घेतला. करमाडपर्यंत आल्यानंतर थकल्यामुळे ते रुळावर झोपले. यावेळी जालनाकडून येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली सापडल्यामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील घटनेची दखल घेतली असून केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे. शक्य ती सर्व मदत दिली जावी अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकार व माध्यप्रदेश सरकारने मृत कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे.