लॉक डाऊन मधून गावी जाण्यासाठी  सोमवारपासून मोफत एसटी सेवा सुरू होणार : अनिल परब

 


लॉक डाऊन मधून गावी जाण्यासाठी  सोमवारपासून मोफत एसटी सेवा सुरू होणार : अनिल परब


मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने लॉक डाऊन जाहीर केला. लॉक डाऊन मुळे  राज्यातील मजूर, कामगार, प्रवाशी वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकले आहेत. त्यांना गावी जाण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांना गावाला जायचे आहे, त्यांना सोमवारपासून एसटीतून त्यांच्या गावाला मोफत सोडले जाणार आहे. एका बसमधून फक्त २२ प्रवाशांनाच त्यांच्या गावाला सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. ही सुविधा फक्त येत्या १७ मेपर्यंतच सुरू राहणार असल्याचचेही परब यांनी सांगितले.
      राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक मजूर, विद्यार्थी, फिरायला गेलेले प्रवाशी आणि इतर लोक अडकलेले आहेत. त्या सर्वांना सोमवारपासून आपल्या मूळ गावाला जाता येणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेकांना आपापल्या घरी जाता येणार आहे. गावी जाण्यासाठी नागरीकांनी २२ जणांची एक यादी तयार करावी. शहरात असणाऱ्या लोकांनी यादी तयार करून जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी, तर गावातील लोकांनी ही यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे द्यावी.  या यादीमध्ये त्यांचा मोबाइल नंबर, आधारकार्ड, राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी जायचे आहे, याची माहिती द्यायची आहे. २२ जणांचा ग्रुप तयार झाल्यानंतर पोलीस किंवा जिल्हाधिकारी त्यांना बस कोठून सुटेल याचे ठिकाण कळवतील , त्यानंतर डेपोत येऊन बसमधून गावाला जायचे आहे. प्रत्येक व्यक्तीने  खाण्यापिण्याची स्वत:ची व्यवस्था स्वतः करायची आहे. गावी जाण्यासाठी कोणतेही भाडे आकारण्यात येणार नाही,  हा प्रवास मोफत असेल असे परब यांनी सांगितले. गावी जाताना एसटीमध्ये फक्त २२ प्रवाशांनाच बसण्याची परवानगी दिली जाईल. प्रत्येक सीटवर एकच प्रवासी असेल. मास्क लावून आलेल्या प्रवाशांनाच एसटीत प्रवेश दिला जाईल , गावी जाण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून कोणत्याही व्यक्तीने पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयात गर्दी करू नये, सोशल डिस्टनसिंग पाळावे असे आवाहनही परब यांनी केले आहे. गावी गेलेल्या व्यक्ती गावाकडे पोहोचल्यानंतर या प्रवाशांची तपासणी करायची की नाही याचा निर्णय संबंधित नोडल अधिकारी घेतील .
राज्यातील कोणत्याही रेड झोन कंटेन्मेंट झोनमधील कोणत्याही व्यक्तीला प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. तसेच कुणालाही कंटेन्मेंट झोनमध्ये सोडलं जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रवासापूर्वी आणि नंतर एसटीचं संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.  सोमवारपासून एसटीचं पोर्टल सुरू होणार आहे. या पोर्टलवरून परवानगी घेतल्यावरच वैयक्तिक प्रवासाला मुभा देण्यात येणार  आहे.