महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळने आंतर जिल्हा आणि आंतर तालुका एसटी सेवा सुरु करण्याची मनसेची मागणी
मिरारोड- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळने आंतर जिल्हा आणि आंतर तालुका एसटी सेवा सुरु करण्याची मीरा भाईंदर मनसेने परिवहन मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. २३ मार्च पासून महाराष्ट्र राज्यात शासकीय सार्वजनिक आंतरजिल्हा वाहतूक व्यवस्था कोव्हिड-१९ विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सुरक्षितता बाळगण्यासाठी बंद ठेवलेली आहे. लॉकडाऊन काळात प्रवासाचे निर्बंध व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने सर्वसामान्य नागरिक, चाकरमानी यांना मूळ गावी जाता येत नाही. सदर शासकीय वाहतूक सुविधा /व्यवस्था उपलब्ध नसल्याने विविध जिल्ह्यात अनेक कारणास्तव गेलेले नागरिक आजही त्या त्या ठिकाणीच अडकून पडलेले आहेत, सामान्य नागरिक, कामगार तसेच संबंधित व्यक्ती आंतरजिल्हा तालुका सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेऊ इच्छितात त्यांच्याकडून आरोग्यविषयक प्रमाणपत्र घेऊन संबंधित आरक्षण धारकांची संपूर्ण यादी गंतव्य ठिकाण /आगार तालुकास्तरावरील शासकीय अधिकारी यांच्याकडे आगाऊ पोहोचेल अशी तजवीज करावी. अशा स्वरूपाच्या नियम व अटींची पूर्तता असा योजनाबद्द आराखडा तातडीने आखून राज्य परिवहन विभागाने आगाऊ तिकीट आरक्षण प्रणाली तिकीट नोंद करून विविध आगारातून आंतरजिल्हा तालुका एसटी वाहतूक सुरू करण्यासंबंधी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. परराज्यातील स्थलांतरित मजूर यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एसटी राज्याच्या सीमेपर्यंत तसेच महाराष्ट्र व केंद्र शासनाने रेल्वेची सोय केल्याने महाराष्ट्रातील कामगार, नागरिक चाकरमानी यांना राज्यांतर्गत सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध केला नाही याचा संताप अनावर होईल,उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडेल याबाबत दक्षता घेणे नितांत गरजेचे आहे. सर्व ती खबरदारी घेऊन एसटी बस सुरू करण्याची मागणी दिनेश कनावजे शहर संघटक , महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी
परिवहन मंत्री ,जिल्हाधिकारी ठाणे
यांच्याकडे केली आहे.