दारुऐवजी सॅनिटायझरची निर्मिती,
जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी
कोरोनामुळे जगभरात कधीही न घडलेल्या घटना घडत आहेत. त्यातीलच 10 महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे
मुंबई - जगभरात कोरोनासंसर्गानं थैमान घातलं आहे. त्यामुळे जगभरात इतर कशाहीपेक्षा कोरोना संसर्गाच्या नियंत्रणावर अधिक लक्ष केंद्रित झालं आहे. अगदी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसेच ही जगासाठी आरोग्यविषय आणीबाणी असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जगभरात त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळेच जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात जनता कर्फ्यूच्या घोषणेमुळे अशाच काहीशा न घडलेल्या गोष्टी घडल्या आहेत.
१. युरोपातल्या अनेक दारु कंपन्यांनी आता दारुऐवजी सॅनिटायझर बनवणं सुरु केले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि अनेक देशांनीही आपापल्या देशातल्या यंत्रणाना सॅनिटायझर आणि मास्कची निर्मिती वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर युरोपमधल्या काही दारु बनवणाऱ्या कंपन्यांनी तात्पुरत्या स्वरुपात दारुऐवजी
सॅनिटायझरची निर्मिती सुरु केली आहे.
२. कोरोना व्हायरसच्या फैलावानंतर चीनमध्ये पहिल्यांदाच सिनेमागृहं सुरु झाले आहेत. चीनमधल्या वृत्तपत्राच्या दाव्यानुसार देशातल्या एकूण १७ हजारहून अधिक सिनेमागृहांपैकी ५०० सिनेमागृहं सुरु ठेवण्याची परवानगी मिळालीय. मात्र खबरदारी म्हणून या सर्व सिनेमागृहांमध्ये एकही व्यक्ती फिरकलेला नाही.
३. आजपर्यंतच्या इतिहासात भारतात पहिल्यांदाच लॉकडाऊन झालंय. जगात लॉकडाऊन हा शब्द पहिल्यांदा अमेरिकेतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रचलित झाला. त्या हल्ल्यावेळी लॉकडाऊन करणारा अमेरिका हाच जगातला पहिला देश होता. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना आपापल्या घरात नजरकैदेत
ठेवलं जात आहे.
४. दक्षिण कोरियात एकाच महिलेद्वारे तब्बल ५ हजार लोकांमध्ये कोरोचा विषाणू संक्रमित झाल्याचं बोललं जातंय. चौकशीअंती कोरियातल्या शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढलाय. संबंधित महिला नियमितपणे एका चर्चमध्ये जात होती. त्याच चर्चमध्ये नंतर हजारो जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ही महिला जिथं-जिथं गेली, तिथंही कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याचं बोललं जात आहे.
५. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लॉकडाऊनला नकार दिल्यानंतर तिथल्या सिंध आणि पंजाब या दोन्ही राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दुपारपर्यंत पाकिस्तानमधील कोरोनाबाधितांचा आकडा ९०० च्या वर गेलाय. कोरोनाबाधितांच्या पहिल्या पन्नास देशांच्या यादीतही पाकिस्तानचा समावेश झालाय. दरम्यान, भारतानंतर पाकिस्तानातही रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.
६. कोरोना व्हायरसच्या पहिल्या स्वदेशी प्रायव्हेट टेस्टिंग किटला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता खासगी लॅबमध्येही कोरोनाची तपासणी शक्य होणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार एका किटद्वारे शंभर लोकांची तपासणी होऊ शकते. पुण्यातल्या मायलॅब डिस्कव्हरी सॉल्युशंस कंपनीला ही परवानगी दिली गेलीय. अशाप्रकारची परवानगी मिळालेली ही देशातील पहिलीच कंपनी आहे.
७. देशातलं सर्वोच्च न्यायालय अद्यापही सुरु आहे. मात्र अगदी मोजक्याच कोर्टरुममध्ये सुनावणी होतेय. २३ मार्चपासून अनेक खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे होणार आहे. दोन्ही बाजूचे वकील व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारेच आपली बाजू मांडणार आहेत. देशातंर्गत न्यायलयीन खटल्यांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय
८. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आर्थिक वर्ष ३१ मार्चऐवजी ३० जून केलं गेलंय. एरव्ही मार्च एन्ड हा शब्द सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र कोरोनाच्या सावटामुळे यंदा मार्च एन्ड ऐवजी जून एन्ड म्हणावे लागणार आहे. एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाची पद्धत भारतात ब्रिटीशांनी आणली. अंदाजे १८६० सालापासून भारतात ३१ मार्चनंतर नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे.
९. आर्थिक वर्ष पुढं ढकललं गेल्यामुळे इनकम टॅक्स रिटर्नचीही मुदत ३० जूनपर्यंत केली आहे. कर भरणाऱ्यांना याआधीही अनेकदा मुदतवाढ दिली जाते. मात्र एकाचवेळी थेट २ महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
१०. मागच्या ३ वर्षानंतर एटीएम शुल्क पहिल्यांदाच रद्द केले आहे. कोरोनामुळे पुढचे तीन महिने तुम्ही एटीएममधून कितीही वेळा पैसे काढले, तरी त्याचा चार्ज लागणार नाही. मुंबईत १९८७ साली एचएसबीसी बँकेने देशात पहिलं एटीएम चालू केले होते. त्यानंतरचे अनेक वर्ष एटीएमवर कोणताही शुल्क नव्हता. दरम्यान, याचबरोबर बँकांमध्ये झिरो बॅलन्स झाला , तरी दंड आकारला जाणार नाही.